देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता. मात्र, आता त्यांना मत द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. “देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य बेचिराख करण्याचं काम केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य उध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा मराठा समाजातील गोरगरीब जनतेला होती. मात्र, आता ती अपेक्षा फोल ठरली”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं, ज्या मराठ्यांनी…”; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!

“सामाजिक चळवळीत काम करताना असताना वैचारिक मतभेद असतात, पण मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठा समाजाचे पोरं मोठे झाले, तर आपलं काय होईल, मराठ्यांची पोरं आरक्षणापासून तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे, हे पोरं भिकारी झाले पाहिजे, हे वचन देंवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे रचली. त्यांची चाल आता यशस्वी झाली”, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली.

“आतापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या हातात होतं. सत्ता त्यांच्या हातात होती. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की माणूस आपल्याला मराठा आरक्षण देणार नाही. अखेर त्यांच्या पोटात जे होतं, ते आता बाहेर आलं आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – नारायणगडावरील दसऱ्या मेळाव्यावरून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “नवीन मेळावा सुरु करून…”

“देवेंद्र फडणीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता. मात्र, आता त्यांना मत द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.