Ajit Pawar on Devendra Bhuyar Statement : अजित पवारांचे समर्थक आणि आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत अत्यंत अपमानजनक वक्तव्य समोर आलं आहे. मुलींच्या लग्नाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या वक्तव्याची दखल घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधून त्यांची कानउघाडणी केल्याची माहिती खुद्द अजित पवारांनी दिली. आज ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणाले होते?

“तरुण मुलगा शेतकरी असेल, तर त्‍याला लग्‍नाला कुणी मुलगी देत नाही, अशी परिस्थिती आहे. एक नंबर स्मार्ट, देखणी मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांंना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा छोटा-मोठा व्यवसाय असेल, किराणा दुकान असले, तर त्याला मिळते अन् तीन नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहते… ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचे काही खरे राहिले नाही”, असं देवेंद्र भुयार म्हणाले होते. याच विधानावरून त्यांच्यावर टीका झाली.

हेही वाचा >> “तीन नंबरची गाळ मुलगी शेतकऱ्यांच्या पोरांना…”; आमदार देवेंद्र भुयार महिलांविषयी जे बोलले त्यामुळे…

अजित पवार काय म्हणाले?

“देवेंद्र भुयारांचं वक्तव्य मुलींना वेदना देणारं होतं. शेतकऱ्यांच्याबद्दल अपमान वाटणारं होतं. याबाबत मला कळाल्या कळाल्या मी रात्र त्यांना फोन केला. ते शेतकरी संघटनेतून निवडून आले होते. त्यांनी मला सांगितलं की माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीकोनात मुली नोकरदारांना प्राधान्य देतात. पूर्वी मुली प्राधान्य बागायतदारांना द्यायच्या. ते बोलताना चुकले आहेत. चूक ती चूकच आहे. त्यासंदर्भात मी त्याला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मला अजिबात त्याचं स्टेटमेंट योग्य वाटलं नाही. त्यांनी त्यांचं स्टेटमेंट मागे घेण्याबाबत मी त्यांना सांगितलं आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांची कानउघाडणी केली.

सुषमा अंधारे यांनीही केली होती टीका

शिवसेना ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र भुयार यांच्‍यावर टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांचं अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखे आहे. परंतु सध्या शिंदे गट, अजित पवार गटांचे लोक बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलीस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे.