Ajit Pawar in Maharashtra Budget Session 2025 : महाराष्ट्रात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झालं आहे. आज विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषण पार पडलं. त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरं, कृषी पंपांना वीजेच्या दरात सवलत व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. तसेच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद जाहीर करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्याच्या कानाकोपऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी यंदा एकूण ६,४८६.२० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी निव्वळ भार ४,२४५.९४ कोटी रुपये इतकाच आहे”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५’ च्या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागातील घरं, कृषीपंपांना वीजदरात सवलत, रस्ते विकासाला गती अशा पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या योजनांसाठी वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं, मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजनेंतर्गत कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र शासनाच्या योजनांतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना, तसेच शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांसाठीचा निधी या सर्वांचा समावेश आहे.

“राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी ६,४८६.२० कोटी रुपये निधीची तरतूद”

अजित पवार म्हणाले, “राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी या अनुषंगानं यंदा एकूण ६,४८६.२० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यातील निव्वळ भार ४,२४५.९४ कोटी रुपये इतकाच आहे. आज विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एकूण ६,४८६.२० कोटी रुपयांपैकी ९३२.५४ कोटी रुपये अनिवार्य मागण्या, ३,४२०.४१ कोटी रुपये कार्यक्रमांतर्गत मागण्या, २,१३३.२५ कोटी रुपये केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून प्रस्तावित आहेत. या पुरवणी मागण्यांद्वारे राज्यातील विविध घटकांचा सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा मला विश्वास आहे”.