राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवातच काहीश्या तापलेल्या वातावरणात झाली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सुरुवात झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधला. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली. त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केली. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे. या मुद्द्यावरूनच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांना जर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत, चारच दिवसात राज्य विकून मोकळे होती, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याच्या या विषयाला आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरुवात केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा जर पक्षातल्या कोणावर विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना जबाबदारी देऊन त्यांना मुख्यमंत्री करावं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते जबाबदारी देऊ शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे जबाबदारी देत नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.