Ajit Pawar On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज (१२ एप्रिल) रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याकडून फाईली मंजूर होत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांवर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता अमित शाह मला असं काही बोलले नाहीत, असं म्हणत या चर्चा अजित पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
अर्थ खात्याकडून फाईली मंजूर होत नाहीत, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं की, “मला अमित शाह हे असं काहीही बोललेले नाहीत. आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी अमित शाह यांच्याबरोबर होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बरोबर होते”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जर काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे ते थेट अमित शाह यांच्याकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. काही असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट माझ्याशी बोलतील, किंवा पीएशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयासंदर्भात एकत्र येत असतो. चर्चा करत असतोत, मार्ग काढत असतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
रायगडावर भाषण का नाही केलं?
रायगडावर नेमकं काय घडलं? भाषण का केलं नाही? याचं कारण स्वत: अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसं गेलं पाहिजे? या संदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणं केले. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.