राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा लोणावळा येथे संपन्न झाला. या मेळाव्यात शरद पवार यांनी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला, त्यानंतर दोन्ही गटातील वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दमदाटी केले असल्याचे शरद पवार यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी थेट शेळके यांना इशारा दिला. “मला शरद पवार म्हणतात, खबरदार इथल्या कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी कराल तर..”, अशा शब्दात शरद पवार यांनी शेळके यांचा समाचार घेतला.

“…नाहीतर शरद पवारांनी खोटं वक्तव्य केल्याचं मान्य करावं”, सुनील शेळकेंचं खुलं आव्हान; दमदाटीचा वाद तापला!

शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर आमदार सुनील शेळके यांनीही पत्रकार परिषद घेऊन शरद पवार गटावर पलटवार केला. शेळके म्हणाले की, लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्याला शरद पवार यांना चुकीची माहिती देऊन बोलावण्यात आले होते. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते आज पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तिथे राष्ट्रवादीचे ३० ते ३५ कार्यकर्ते जमले होते. मेळावा अपयशी ठरल्याचे खापर स्वतःवर फुटू नये, म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळेच शरद पवार यांनी माझ्यावर व्यक्तिगत टिप्पणी केली.

“…तर शरद पवार म्हणतात मला’, पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा; म्हणाले, “मी त्या वाटेने गेलो तर…”

सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले होते. “एकीकडे अजित पवारांकडून मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात बंड करायचे, हे प्रकार रोहित पवारांनी थांबवावेत”, असा आरोप त्यांनी केला होता. २२ जून २०२२ रोजी मंत्रालयात अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी रोहित पवारदेखील होते, असा गौप्यस्फोट शेळके यांनी पत्रकार परिषदेतून यापूर्वीच केला होता.

आज लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार गटात ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, त्यातील बहुसंख्या कार्यकर्ते हे आधीपासूनच त्या गटाबरोबर होते. अजित पवार गटाबरोबर असल्याचे शपथपत्र ज्यांनी दिले, त्यापैकी एकही कार्यकर्ता सोडून गेलेला नाही, असेही स्पष्टीकरण सुनील शेळके यांनी दिले. शरद पवार गटात आज १३७ लोकांनी प्रवेश केल्याचे सांगितले जाते. पण त्यांनी केवळ ३७ लोकांची नावे जाहीर करून दाखवावी, असेही आव्हान सुनील शेळके यांनी दिले.

Story img Loader