Ajit Pawar Mahayuti CM Candidate for Assembly Election 2024 : राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षांचे नेते राज्यभर दौरे करत आहेत, मेळावे आणि सभा घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार याबाबतीत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहेत. दरम्यान, अजित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील असे दावे अजित पवारांच्या पक्षातील नेते करत आहेत. मात्र महायुतीने अद्याप त्यांचा महायुतीचा चेहरा कोण असेल ते ठरवलेलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय कोणत्या आधारावर घेणार? जागांच्या आधारावर की स्ट्राईक रेटचा विचार करून निर्णय घेतला जाणार? अजित पवार गटाने महायुतीमध्ये किती जागांची मागणी केली आहे आणि अजित पवार गटाला विधानसभेच्या एकूण किती जागा मिळतील? अशा काही प्रश्नांची अजित पवार यांनी उत्तरं दिली आहेत.

अजित पवार म्हणाले, “आम्ही केवळ राज्यात महायुतीचे सरकार कसं आणता येईल, आपल्या म्हणजेच महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील, याचाच विचार केला आहे. आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. सध्या तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मी लोकांसमोर जात आहोत”. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter :”अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारण्यापेक्षा थेट…”, उदयनराजेंची तीव्र प्रतिक्रिया

पक्षातील लोकांची नाराजी कशी दूर करणार?

यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षातील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही त्यांची नाराजी कशी दूर करणार? त्यावर अजित पवार म्हणाले, एखादी जागा भाजपाला मिळाली आणि तिथले आमचे पदाधिकारी नाराज असतील तर त्यांची समजूत काढण्याचं काम अजित पवारचं असेल. एखादी जागा आम्हाला मिळाली आणि तिथे भाजपाचा पदाधिकारी नाराज असेल तर त्या पदाधिकाऱ्याची समजूत काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांना करावा लागेल. त्याचप्रमाणे जिथे आम्हाला किंवा भाजपाला जागा मिळेल आणि तिथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता नाराज असेल तर शिंदे गटाने त्या पदाधिकाऱ्याची समजूत काढायची असं ठरलं आहे. आजवर इतक्या निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणी थोडी बहुत नाराजी असतेच. त्यासाठी आम्ही लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करणार आहोत. निवडणुकीच्या काळात काही लोक इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, तसे प्रयत्न होतात, त्याला इलाज नाही.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter : “एन्काउंटर फेक असलं तरी…”, शिंदे गटाने विरोधकांना सुनावलं; आरोपीच्या आई-वडिलांना म्हणाले, “तुम्ही आता…”

बिहार व आंध्र प्रदेशचं उदाहरण देत म्हणाले…

उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला मॅजिक फिगर (१४५ जागा) गाठायची आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. खरंतर मॅजिक फिगरच्याही पुढे जाण्याचं आमचं लक्ष्य आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, लोकांसाठी आम्ही चांगल्या योजना आणल्या आहेत. केंद्राने आपल्याला निधी दिला आहे. इथून पुढेही मोठा निधी राज्याला मिळवून द्यायचा आहे. बिहार व आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्राला अधिकाधिक निधीचा लाभ करून द्यायचा आहे.