Ajit Pawar On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका आणि सभा घेत आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावारण तापलं आहे. विधानसभेची निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासारखं या निवडणुकीच्या प्रचारातही पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. या टीकेनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण तापलं होतं. या अनुषंगानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य करत शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपाच्या वरिष्ठाशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ‘यापुढे आता मी देखील ठरवलं आहे की, शरद पवारांबाबत काहीही बोलायचं नाही’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा : मुख्यमंत्रिपदाचं ठरलंं का? अजित पवारांनी सांगितली आतली बातमी; म्हणाले, “मी आज…”

अजित पवार काय म्हणाले?

“शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही बोललं किंवा टीका केली तर लोकांना आवडत नाही. देशातील जनताही त्यांच्याकडे एक जेष्ठ नेते म्हणून पाहते. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की, आधी जे काही घडलं त्यावर आणि त्यांच्याबाबतही काही बोलायचं नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. याबाबत अजित पवार म्हणाले, “शरद पवार यांच्यावर टीका केली तर मलाही खंत वाटली आणि वाईटही वाटलं, ते जनतेलाही आवडलेलं नाही. मात्र, याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बसून चर्चा केली. आता ते त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा करतील”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार शरद पवारांबरोबर जाणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. त्यानंतर अजित पवार हे महायुतीबरोबर तर शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, यासंदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील नेते एकत्र मिळून घेतील. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दांत उत्तर दिलं आहे. शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “नो कमेंट्स.”, असं दोन शब्दांमध्ये उत्तर देत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on sharad pawar pm narendra modi amit shah devendra fadnavis maharashtra politics gkt