गेल्या दोन दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. यावरून सत्ताधारी भाजपानं त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. काहींनी त्यांच्यावर फौजदारी कारवाईचीही मागणी केली. या पार्श्वभूमीवर एकीकडे जितेंद्र आव्हाडांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर खेद व्यक्त करतो अशी भूमिका जाहीर केली असताना दुसरीकडे अजित पवार यांनी त्यावर अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असं विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं. वाल्मिकी रामायणात यासंदर्भातला उल्लेख आहे, असं आव्हाड म्हणाले. मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, असंही ते म्हणाले. मात्र, आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो, असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला.
दरमान, आव्हाडांच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटत आहेत. अयोध्येतील आचार्य परमहंस नामक व्यक्तीने तर थेट आव्हाडांचा वध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण अद्याप शांत झालं नसल्याचं दिसून येत असताना यावर अजित पवारांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया देऊन या वादात पडण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचंच स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांना पुण्यात माध्यम प्रतिनिधींनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता “नो कमेंट्स” असं म्हणत सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनीही आक्षेप घे धर्माच्या नावावर वाद निर्माण करू नये, अशा कानपिचक्या दिल्या. मात्र, याबाबत विचारलं असता त्यावर आपल्याला काहीच बोलायचं नसल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. “मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. नो कॉमेंट्स. कशासाठी खपल्या उकरून काढायचं काम करताय?” असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला.