Ajit Pawar NCP Rally in Alandi : “कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आळंदी येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या विचारधारा मांडा. परंतु, ते करत असताना समाजात दुही निर्माण करू नका. कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा विरोध करत राहील”. हे वक्तव्य करत असताना अजित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता हे समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील काही नेत्यांनी मुस्लिमविरोधी वक्तव्ये केली आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांचा रोख नितेश राणेंकडे होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजित पवार म्हणाले, राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील तर तुम्ही मांडू शकता. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत मांडायला हरकत नाही. परंतु, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करता. समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगलं नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र ते कदापी खपवून घेणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या गोष्टींचा तीव्र विरोध करत राहील. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. तसेच अशा प्रकरणांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही.

हे ही वाचा >> MP Prashant Padole : खासदार डॉ.प्रशांत पडोळेंचा गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास; Video व्हायरल

मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २० वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. या वक्तव्यावरून नितेश राणे यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुस्लिम धर्मियांबाबतीत बदनामीकारक घोषणा देऊन राणे यांनी धार्मिक भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०२, ३५१ (२), ३५२, ३५३ (२) प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Story img Loader