राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मोठी मागणी केली. “खारघरमधील घटना निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या नातेवाईकांना २० लाख, तर बाधितांना उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत द्यावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

अजित पवार म्हणाले, “खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप ११ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी.”

“लाखो अनुयायी तब्बल ७ तास उन्हात होते”

“पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे २० लाख अनुयायी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला.लाखो अनुयायी तब्बल ७ तास उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत ११ निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला. घटनेच्या दिवशीच मी स्वतः नवी मुंबईतील एम.जी. एम. रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

“भव्यदिव्य करून दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्पाप अनुयायांना वेठीस धरले”

अजित पवार पुढे म्हणाले, “राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात आहेत. साहजिकच अशा प्रकारच्या सोहळ्याला लाखो अनुयायी उपस्थित राहतील, हे लक्षात घेणे गरजेचे होते. एवढा मोठा कार्यक्रम, मोकळ्या मैदानावर, दुपारच्या वेळी आयोजित करून निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आहे, अशी भावना आज सर्वसामान्यांची झाली आहे. उष्णतेची मोठी लाट आलेली असताना बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करून आणि त्याचं थेट प्रक्षेपण करून ही दुर्घटना टाळता आली असती. मात्र, काही तरी भव्यदिव्य करून दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्पाप अनुयायांना वेठीस धरले गेले आणि त्यात ११ अनुयायांचा बळी गेला.”

हेही वाचा : भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या…”

“ही दुर्दैवी घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती”

“या कार्यक्रमाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मृत्यूंना पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. या दुर्घटनेबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे सरकारविरुद्ध तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि त्यामुळे झालेल्या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

“मृतांच्या नातेवाईकांना २० लाख, तर बाधितांना ५ लाख रुपये द्या”

“मृतांच्या नातेवाईकांना केवळ पाच लाख रुपयांची मदत करून सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. तसेच या दुर्घटनेमुळे बाधितांना मोफत उपचार देऊन त्यांनाही प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करावी,” अशीही मागणी अजित पवार यांनी पत्रकात केली आहे.

Story img Loader