सोलापूर : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे. यात ११०६२ चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे. एकीकडे राज्य शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असताना दुसरीकडे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून रखडलेले भूसंपादन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यामुळे आगामी काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती. त्याप्रमाणे ही जागा संपादन करण्याची जबाबदारी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीवर निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधी मंदिर समितीची नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. परंतु भूसंपादन रखडले होते. आवश्यक कालावधी टळल्यानंतरही भूसंपादन न झाल्यामुळे मूळ जागामालकांनी जागा खरेदी करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नोटीस बजावली होती. कायदेशीर नियमानुसार आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढे एक वर्षाच्या मुदतीत जागा संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होऊ शकते. त्यामुळे अक्कलकोट शहराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचा विचार करूनच नगरपालिकेने जागा संपादनासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

हेही वाचा : महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट

श्री स्वामी समर्थ मंदिरात आणि शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज हजारो भाविक येतात. दर गुरुवारी, अमावास्या पौर्णिमेसह गुरूपौर्णिमा, इतर धार्मिक सण उत्सवात आणि शासनाच्या सुट्टी काळात येणाऱ्या भाविकांची संख्या अनेक पटींनी जास्त असते. परंतु मंदिर परिसरासह तेथील रस्ते चिंचोळे आहेत. इतर आवश्यक पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्याचा विचार करून भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने सुरू झाल्यामुळे श्री स्वामी भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

तथापि, दुसरीकडे मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होत असताना आरक्षणानुसार मंदिर परिसरातील जागा मिळकतदारांना खरेदी-विक्रीसह घर बांधकामांना कायदेशीर अडचणी येत आहेत. मंदिराजवळ राहणारे दिलीप हणमंतराव कुलकर्णी यांनी स्वतःच्या वडिलोपार्जित मालकीच्या जागेत केलेले घराचे बांधकाम नगरपालिकेने बेकायदेशीर ठरवून पाडले आहे. कुलकर्णी यांच्या मालकीची जागा रीतसर संपादित करून त्याचा मोबदला नगरपालिकेने दिला नाही. त्यास वर्षानुवर्षे विलंब लागत असताना मिळकतदार नगरपालिकेकडे बांधकाम परवाने मागत आहेत. बांधकाम परवाने दाखल केल्यानंतर त्याची उत्तरेही मिळत नाहीत, याबद्दल दिलीप कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akkalkot swami samarth temple land acquisition process started css