Akshay Shinde Encounter by Police Badlapur Sexual Assault Case Sanjay Nirupam Reacts : बदलापूरमधील चिमुकल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून अक्षयला ठार केलं. दरम्यान, या चकमकीवरून राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही लोकांनी हे एन्काउंटर खोटं असल्याचे दावे केले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे खोटं एन्काउंटर घडवून आणलं का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच यावर शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय निरुपम म्हणाले, मला विरोधी पक्षांची कीव येते, मी त्यांचा निषेध करतो. हेच लोक काही दिवसांपूर्वी म्हणत होते की आरोपीला भर चौकात फाशी द्या आणि आता आम्ही बलात्काऱ्याला मारलं, आमच्या पोलिसांनी त्याचा एनकाउंटर केला, ती प्रवृत्ती नेस्तनाबूत केली तर हेच लोक राजकारण करू लागले आहेत. मला विरोधी पक्षांना विचारायचं आहे की तुम्ही या बलात्काऱ्याबरोबर आहात की त्याला ठार करणाऱ्या पोलिसांबरोबर? पश्चिम बंगालमध्ये अशीच बलात्काराची घटना घडली. त्यांनी बलात्काऱ्यावर उचित कारवाई केली नाही. मात्र महाराष्ट्रात बलात्काऱ्यावर कारवाई करणारा मुख्यमंत्री आहे तर हेच विरोधक त्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.

संजय निरुपम म्हणाले, “आम्ही शिवसनेचे लोक ठामपणे सांगतो की ज्याने असं अमानवी कृत्य केलं असेल त्याच्यावर कारवाई करताना कायद्याची पर्वा करू नका. हल्ली रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की लहान मुलीवर बलात्कार, कार्यालयांमध्ये बलात्कार, लैंगिक शोषणाच्या बातम्या वाचायला मिळतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे”. संजय निरुपम एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचं एन्काउंटर खरं की खोटं? बदलापुरात नेमकं काय घडलं? प्रत्येकाचे वेगवेगळे दावे

“अशा प्रवृत्तींना समाजात राहण्याचा अधिकार नाही”

यावेळी निरुपम विचारण्यात आलं की हे एन्काउंटर खरं आहे की ही हत्या आहे? त्यावर निरुपम म्हणाले, “हा एन्काउंटरच आहे, असं मला सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास चालू आहे. समजा की तो फेक एन्काउंटर आहे, तरी हरकत नाही. कारण अशी अमानवी कृत्ये करणारे लोक, जे आमच्या लहानग्या लेकीबाळींवर वाईट दृष्टी ठेवतात, त्यांच्याबरोबर दुष्कृत्य करतात, बलात्कार करतात अशा प्रवृत्तींना समाजात, देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा समाजाला काही उपयोग नाही. अशा लोकांना मारलंच पाहिजे”.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

निरुपम म्हणाले, “अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भावनेचा मी सन्मान करतो. मात्र त्यांच्या मुलाने मानवजातीला काळीमा फासला आहे. त्यांनी आता ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. अक्षयने पुरूष जातीचं नाव खराब केलं आहे. त्याच्या आई-वडिलांनी आता समाजासाठी त्याग करण्याची तयारी दर्शवली पाहिजे”.