Akshay Shinde Encounter Jitendra Awhad Sharad Alleged Eyewitness Audio Clip : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. बदलापूरकरांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. या प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी असला तर शाळेचे संस्थाचालकही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. त्यांना पकडण्याआधी व अक्षय शिंदेंकडून चौकशीत अधिक माहिती मिळण्याआधीच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आहे. पोलिसांचं पथक अक्षय शिंदेला घटनास्थळी घेऊन गेलं होतं. त्याचवेळी त्याने एका पोलिसाकडून बंदूक हिसकावून थेट पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिहल्ला केला. ज्यामध्ये अक्षय शिंदे जागीच ठार झाला.

या एन्काउंटर प्रकरणानंतर पोलिसांवर टीका होत आहे. पोलिसांनी जाणूनबुजून अक्षयची हत्या केल्याचा, या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे अन्काउंटर केल्याचा आरोप होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा आव्हाडांचा दावा आहे. आव्हाड यांनी म्हटलं आहे की अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काउंटर म्हणून संबोधले जाते आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.

आव्हाड यांनी ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर आता यावर राज्य सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, बदलापूर प्रकरणातील आरोपीला म्हणजेच अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणून मोर्चा काढणारेही लोक आहेत. एन्काऊंटर कधीही मुद्दाम केलं जात नाही. त्या गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या अशा प्रकरणांमध्ये चौकशी केली जाते. या मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार असून लवकरच सत्य आपल्यासमोर येईल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत. अक्षय शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम होता. असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम पोलिसांवरही हल्ले करायला मागेपुढे बघत नाहीत. अशा हल्ल्यांत पोलीस जखमी झाले असतील तर स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नसतो. पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात ही वस्तुस्थिती आहे. आता ही कृती योग्य आहे की अयोग्य हे यंत्रणाच ठरवेल. पोलीस तापासानंतर सत्य आपल्यासमोर येईल.