अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील उमटे धरणाला भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अलिबाग तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी पडलेल्‍या भगदाडाची तातडीने पहाणी केली आहे. धरणाची डागडुजी जिल्‍हा परिषदेकडून केली जाणार आहे. त्‍याचबरोबर धरणाचे मजुबतीकरण गाळ काढण्‍याचे कामदेखील हाती घेण्‍यात येणार आहे.

उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफुट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर ४७ गावे व ३३ आदिवासी वाडया अवलंबून आहेत.

हेही वाचा…विजय शिवतारेंचं भाषण चर्चेत, म्हणाले, “मी लहानपणापासून बंडखोर होतो, चौथीत असताना विड्या…”

उमटे धरणाला तब्बल ४१ वर्षे झाली असल्याने धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या बाह्य बाजूकडील भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. त्यामुळे तेथील भिंतीला भले मोठे भगदाड पडल्याचे दिसून येते. त्यामुळे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.

दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात काही दिवसांपूर्वीच बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी धरणाचे मजबुतीकरण करणे तसेच गाळ काढण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा…कुलूप तोडून काँग्रेसचा खासदार कक्षावर ताबा

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी उमटे धरणाची पाहणी केली. यावेळी जिल्हा मृद् व जलसंधारण अधिकारी श्री. कदम, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर, प्रल्हाद बिराजदार, निहाल चवरकर उपस्थित होते.

हेही वाचा…‘ओबीसी’ आरक्षणास धक्का न लावण्याचे आश्वासन

यावेळी उमटे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिले. डागडुजीसाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार तत्काळ उमटे धरण मजबूतीकरण तसेच गाळ काढण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.