कराड: विधानसभेला काँग्रेस किती जागा लढणार? याचा निर्णय काँग्रेसच्या चार ऑगस्टच्या बैठकीत चर्चेअंती होईल. महाविकास आघाडीचे याआधीच विधानसभा निवडणुकीचे सूत्र ठरलेलेच आहे. परंतु, तीनही पक्ष एकत्रित बसून अंतिम निर्णय घेतील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, राज्यात सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची चीड लोकांमध्ये असून, आता त्यांनी विश्वासघात करणाऱ्यांना शिक्षा करायची की बक्षीस द्यायचे? हे ठरवावे, असा सवालही चव्हाण यांनी या वेळी केला. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून इमारती उभ्या केल्याने शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नुकसान झाले आहे. तर, सलग १५ दिवसांच्या पावसाने शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची शक्यता आहे. अशा नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तत्काळ मदत करणे गरजेचे आहे. केंद्राने पूर नियंत्रणासाठी देशव्यापी कार्यक्रम आखला पाहिजे. परंतु, केंद्राकडे तो दृष्टिकोन नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर परिस्थितीबाबतच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
© The Indian Express (P) Ltd