Ambadas Danve : महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास आता एक महिना होत आला. मात्र, अजूनही काही महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काही नेते नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भुजबळांनी रोष व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं म्हणत मोठं सूचक भाष्यही त्यांनी केलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता छगन भुजबळांच्या नाराजीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. ‘काहीही होऊ शकतं, छगन भुजबळ हे अजित पवार यांच्याबरोबर राहतील असं वाटत नाही’, असं विधान अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis: “२०१४ ला मुख्यमंत्री झालो तेव्हा…”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली १० वर्षांपूर्वीची आठवण!

अंबादास दानवे काय म्हणाले?

छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांच्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यावर प्रतिक्रिया काय? असं अंबादास दानवे यांना विचारलं असता ते म्हणाले, “काहीही होऊ शकतं. आता कधी काय होईल हे सांगता येत नाही. मात्र, सध्या ज्या पद्धतीने छगन भुजबळ व्यक्त होत आहेत. त्याचा विचार केला तर भुजबळ हे अजित पवार यांच्याबरोबर राहतील की नाही याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. तसेच छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. मात्र, अजित पवारांना भेटत नाहीत. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी सूचक भाष्य केलं.

भेटीचा राजकीय अर्थ काय घ्यायचा?

“छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. मग भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे छगन भुजबळ यांना भेटत नाहीत. मग यामधून राजकीय अर्थ काय घ्यायचा? आता मागच्या काही काळात असं म्हटलं जात होतं की, देवेंद्र फडणवीस यांनीच छगन भुजबळ यांना आंदोलने करायला लावले. आता ते सत्य होतं, हे समोर येत आहे. छगन भुजबळ आणखी काही पावलं उचलतील. असं एका दिवसांत कोणती पावलं उचलता येत नसतात. त्यासाठी थोडं थांबावं लागतं. आणखी ८ दिवस, १० दिवस किंवा एक महिना. सर्व गोष्टी एका क्षणात स्पष्ट होत नसतात?”, असं सूचक भाष्य अंबादास दानवे यांनी कालही माध्यमांशी बोलताना केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve on chhagan bhujbal ncp ajit pawar group politics and chhagan bhujbal devendra fadnavis meet gkt