Ambadas Danve On Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज माध्यमांशी बोलताना औरंगजेबाबाबत एक विधान केलं. त्यांच्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं. एवढंच नाही तर औरंगजेबाने मंदिरे बांधल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार अबू आझमी यांच्या विधानावर बोलताना संताप व्यक्त केला आहे. तसेच ‘औरंगजेबाने कोणती मंदिरे बांधली? याची यादी द्या’, असं आव्हान अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांना दिलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

आमदार अबू आझमी यांच्या विधानावर बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “औरंगजेबाने किती मंदिरं बांधली? याची यादी अबू आझमी यांनी द्यावी, तसेच औरंगजेबाने किती मंदिरं तोडली याची यादी आम्ही तुम्हाला देतो”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

अबू आझमी यांचं विधान काय?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती. मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं विधान अबू आझमी यांनी केलं.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे अतिशय दुर्देवी आहे. अबू आझमी यांच्या विधानाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक करणं हे महापाप आहे”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“अबू आझमी अशा प्रकारे जे विधान करत आहेत ते कोणाची सुपारी घेऊन करत आहेत? कोणते वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी याआधीही सांगितलं होतं. कोणाचा इशारा आणि कोण बोलायला लागतं हे मी आधीही सांगितलं होतं. महाराष्ट्रात असं विधान कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

Story img Loader