भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. याला आमचा विरोध आहे. मात्र, आम्हाला यासंदर्भात विधान परिषदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच विधानसभेच्या सभापती पक्षपातीपणे वागतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेत सभात्याग केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा विषय…”

काय म्हणाले अंबादास दानवे?

“विधानपरिषदेच्या सभापती पक्षपातीप्रमाणे वागत आहेत. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार वाट्टेल ते बोलतात. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. खरं तर खेळाडूंचं अभिनंदन व्हायला हवं, खेळाडू मेहनत घेतात आणि भारताचं नाव उंचावतात. मात्र, त्यांचे अभिनंदन सोडून भाजपाच्या नेत्यांचं अभिनंदन करण्यासाठी सांगत आहेत”, असा आरोप अंबादास दानवे यांनी केल आहे.

“भाजपाला देशाशी काही देणं-घेणं नाही”

“हा खेळाडूंचा आणि भारतीय क्रिकेट संघाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाला देशाशी काही देणं-घेणं नाही. त्यांच्याकडून केवळ स्वत:च्या नेत्यांचा विचार केला जातो. अशा विषयावर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जातं. मात्र, विरोधपक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नाही. हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला”, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अंबादास दानवेंचं अजित पवार गटाबाबत मोठं विधान; म्हणाले, “अर्ध्या लोकांचा महायुतीला…”

“विधान परिषदेच्या सभापतींकडून पक्षपातीपणा”

“भाजपाकडून खेळाचं राजकारण केलं जात आहे. जे मैदानावर परीश्रम करतात. त्यांच्यामुळे आज आपण विश्वचषक जिंकलो आहे. त्याचं सोडून आशिष शेलार यांचे अभिनंदन कशाला करायचं? अशावेळी सभापतीदेखील सत्ताधाऱ्यांची बाजू घेतात. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. ते पक्षपातीपणे वागत आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.