सावंतवाडी येथून गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहीका सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कोलवाळ गोवा येथे रस्त्यावर अग्नि प्रलयात जळून खाक झाली. सुदैवाने रुग्णवाहीकेवर असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये असलेल्या रूग्णासह डॉक्टर व चालक बालंबाल बचावले.
काल सोमवारी मध्यरात्री हा दुर्दैवी प्रकार घडला तोही मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.सदर रुग्णवाहीका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात होती. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात यूरोलॉजिस्ट डॉक्टर नसल्याने हा रुग्ण गोवा येथे पाठविण्यात आला होता. रुग्णवाहीकेने पेट घेतल्यानंतर दुसऱ्या रुग्णवाहीकेने रुग्णांला गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले. मात्र एवढी गंभीर घटना घडून सुद्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून मध्यरात्री घटनास्थळी भेट किंवा त्या रुग्णाची भेट घेण्याची साधी माणुसकी दाखवली नाही म्हणून संताप व्यक्त केला जात आहे.
वेंगुर्ला वजराट येथील नागरिक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे युरीन इन्फेकशन असल्याने दाखल करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी युरोलॉजिस्ट डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे किंवा निदान करणे कठीण होते. त्यातच रात्री उशिरा त्याला जास्त त्रास होत असल्याने गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज रूग्णालयात रुग्णाला घेऊन जा असे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनने सांगितले. त्यामुळे रात्री साडे अकराच्या सुमारास १०८ ला कॉल केला त्यातच सावंतवाडी येथील रुग्णवाहीका दुसऱ्या कॉलला गेल्याने त्यांना दोडामार्ग येथील रुग्णवाहीका देण्यात आली. साडे बाराच्या सुमारास दोडामार्ग येथून रुग्णवाहीका सावंतवाडी येथे दाखल झाली त्यावर महिला डॉक्टर होती. रुग्णाला घेऊन गोवा येथे जाण्यास निघाली. रुग्ण तब्येत बरी असल्याने तसेच चालत रुग्णवाहीकेत बसल्याने डॉक्टर चालकाच्या शेजारी पुढे बसले होते.
दरम्यान गोवा राज्यातील कोलवाळ येथे रुग्णावाहीका गेली असता. पुढे बसणाऱ्या डॉक्टर यांना गाडीतून धूर येते असल्याचे निदर्शनास आले त्यांनी प्रसंगावधानता राखत चालकाला गाडी थांबविण्यास सांगत मागे जात रुग्णाला व नातेवाईक यांना घाईगडबडीत बाहेर उतरण्यास सांगितले त्यांना घेऊन ते गाडी पासून लांब गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर हा रुग्ण गंभीर असता तर डॉक्टर रुग्णासोबत मागे बसले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती.
मात्र डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर दुसऱ्या रुग्णवाहीकेने रुग्ण गोवा येथे पाठविण्यात आला. मात्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा मध्यरात्री जिल्हा आरोग्य यंत्रनेकडून कोणीच घटनास्थळी पोहचले नाही हे दुर्दैव आहे. त्यावरून जिल्हा आरोग्य प्रशासनावर कोणाचा वचक नाही हे दिसून येते.गेल्या चार वर्षात रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहीकेने अग्नि प्रलयात पेट घेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम तरी करा किंवा रुग्णवाहीका तरी सक्षम करा अशीच मागणी होत आहे.