Amit Shah On Eknath Shinde And Udhhav THackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यानी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (रविवारी) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार याबद्दल स्पष्टता अद्याप मिळू शकलेली नाही. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजापाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीतील विजय आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला…

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागा विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला की ३० वर्षांच्या निवडणूक निकालाच्या डेटानुसार जो पक्ष लोकसभा निवडणूकीत जे काही होतं, जर काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत देखील तोच पॅटर्न पहायला. मग महाराष्ट्रात हा बदल कसा शक्य झाला? अमित शाह म्हणाले की, “तुमच्या विश्लेषणाचा पाया चुकीचा आहे आणि तुमची मेमरीदेखील शॉर्ट आहे. गेल्या निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना ज्या जागांवर लढली त्या जागा आम्ही लढलो नव्हतो, त्यामुळे आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्याबरोबर होती त्यामुळे त्यांना बहुमत मिळालं होतं आणि आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी विश्वासघात केला. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात केला.”

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेने आमच्याबरोबर विश्वासघात केला होता, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने विकासाचे जी कामे केले, मोदी सरकारची मागील १० वर्षांतील सकारात्मक कामे यांच्या जोरावर हा प्रचंड विजय मिळाला आहे”.

हेही वाचा>> मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच

एकनाथ शिंदे नाराज?

राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल विचारले असता अमित शाह म्हणाले की, “शिंदे नाराज असण्याचं काही कारण नाही. आमच्या जागा खूप जास्त आहेत. मागच्या वेळीही आमच्या जागा जास्त होत्या. पण आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्ष त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. यावेळी मात्र सुरुवातीपासूनच सांगत आलो होतो की मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर निश्चित केले जाईल. त्यामुळे कोणी नाराज असण्याची गरज नाही, कोणी नाराजही नाही”.

मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या उशीराबद्दल बोलताना शाह म्हणाल की, आम्हाला जराही अडचण येत नाहीये, सर्वकाही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सुरू आहे. महाराष्ट्रात आधी महाविकास आघाडीचे सरकार होते त्यापेक्षा आम्ही तीन-तीन दिवसांनी पुढे आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah statement on eknath shinde displeasure uddhav thackeray betrayed bjp assembly election result rak