Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरूवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. यात्रेत पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही सहभाग घेतला असताना सर्वांचे लक्ष जनसन्मान यात्रेतील गुलाबी रंगाची वाहने वेधून घेत आहेत. या गुलाबी वाहनांच्या माध्यमातून महिला केंद्रीत योजनांची जनजागृती केली जातेय. मात्र अजित पवारांच्या या पिंक पॉलिटिक्सवर आता सर्वत्र टीका होऊ लागली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जुन्नर येथून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. या शिवस्वराज्य यात्रेत संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची दुसरी बाजू मांडली. या योजना फक्त दोन महिन्यांपुरत्या असल्याचंही ते म्हणाले. एवढंच नव्हे तर त्यांनी यावेळी अजित पवारांवरही थेट टीका केली. ते म्हणाले, नागपंचमीच्या सणाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही सापाला दूध पाजणं म्हणत नाही. शेतकऱ्यांसाठी हा कृतज्ञतेचा सण आहे. म्हणून आपण नागदेवतेची पूजा करतो. पण या सणाचं स्वरुप आजकाल नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजवून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय. हा फरक समजून घ्या. कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे.”

हेही वाचा >> Uddhav Thackeray : “काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंचे हात रिकामे”, भाजपाचा टोला; म्हणाले, “मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत…”

महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला केंद्रीत योजना आणल्या आहेत. तसंच, महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता विविध कार्यक्रमस्थळी गुलाबी रंगांचा सर्वाधिक वापर केला जातोय. एवढंच नव्हेतर हल्ली अजित पवार गुलाबी रंगांचंच जॅकेट घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या या पिंक पॉलिटिक्सकडे आता सर्वांचं जाणीवपूर्वक लक्ष आहे. यावरूनच अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी त्यांना त्यांचं नाव घेता लक्ष्य केलं.

दरम्यान, अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अजितदादांनी जनसन्मान यात्रेत निर्माण केलेल्या झंजावाताने तुतारी गट बिथरला आहे. गुलाबी रंगाचे वावडे असणाऱ्या खासदाराला स्वतः ला गुलाबी रंग लावताना मात्र फार आनंद वाटतो. लोकसभेत थोडे यश काय मिळाले हा गडी तर जनतेला “नागोबा” म्हणायला निघाला”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

यावरून आता अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल.