Amol Mitkari Remark on Jitendra Awhad comment on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडवे विरोधक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने शरद पवारांवर व त्यांच्या पक्षावर टीका केली आहे. या टीकेला प्रत्येक वेळा जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी अनेकदा अजित पवारांवर जहाल टीका केली आहे. दरम्यान, शनिवारी (२ नोव्हेंबर) मुंब्रा-कळव्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची टीका होत आहे. त्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पुढे येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अजित पवारांचा गट ही पाकिटमारांची टोळी असल्याचं आव्हाड म्हणाले होतं. तसेच हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून, नव्या निवडणूक चिन्हासह त्यांनी निवडणुकीला सामोरे जायला हवं होतं, असंही आव्हाड म्हणाले म्हणाले.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विधान परिषद सदस्य व अजित पवारांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी आव्हाडांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खालच्या भाषेत बोलण्याची जितेंद्र आव्हाडाची संस्कृती आहे. ‘विंचवाची नांगी तैसें दुर्जन सर्वांगी’, या अभंगाlतील ओळीप्रमाणे हा (जितेंद्र आव्हाड) दुर्जन व्यक्ती आहे. त्याच्या नसानसांमध्ये विष भरलं आहे. अजित पवारांच्या वडिलांबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (अजित पवार) आव्हाडाने ज्या पद्धतीने टीका केली आहे, ते पाहता मला वाटतं की त्यालाही त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. शरद पवारांनाही खरंच वाटत असेल की जितेंद्र आव्हाडांनी अनंत पवारांचा अपमान केला आहे तर त्यांनी जितेंद्र आव्हाडला बारामतीला बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काढून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा मुंब्रा-कळव्यात जाऊन आम्ही आव्हाडला त्याची औकात दाखवणार.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येणार? छगन भुजबळ म्हणाले, “निदान पुढच्या वर्षी तरी…”

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील सभेत म्हणाले होते, अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजलो असतो. ज्या काकांनी पक्ष स्थापन केला, तो देशभरात पसरवला आणि वाढवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतलं. पण जनतेला सत्य माहीत आहे.

Story img Loader