शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप मंत्र्यांमध्ये खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी (१२ जुलै) अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली. जो माणूस इथे राजासारखं राहत होता, तो माणूस दिल्लीत सुभेदार बनायला चालला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. आव्हाडांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादा कालही राजे होते, आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहतील, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली.

हेही वाचा- “ते दादांचं वैयक्तिक मत, माझं नाही”, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं विधान चर्चेत

अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, “दादा कालही राजे होते. आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहणार. दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते,आजही आहेत, आणि कायमस्वरुपी हुजरेच राहतील… #अंगुरखट्टेहै”

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे. एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari criticise jitendra awhad statement about ajit pawar delhi visit to meet amit shah rmm
Show comments