Amruta Fadnavis : नागपूरमध्ये अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी एका कार्यक्रमात एक छोटं भाषण केलं. भाजपाला पुन्हा निवडून द्या म्हणजे आपली प्रगती होईल असं अमृता फडणवीस म्हणाल्या. तसंच लाडकी बहीण योजना हिट ठरली आहे असंही त्या म्हणाल्या. आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“आज खूप दिवसांनी पावनभूमीत आले. श्रीरामाचं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं. लाडकी बहीण योजना हिट झालेली योजना आहे. देवेंद्र फडणवीसांनी जी संकल्पना मांडली ती महत्त्वाची आहे. प्रत्येक स्त्री जी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचं आहे. त्या विचारांतून आलेली ही संकल्पना आहे. एक सशक्त स्त्री तिच असते जी अशा संकल्पनाचा फायदा घेऊन कुटुंबासाठी त्याचा वापर करते. अशा सगळ्या सशक्त स्त्रिया तुम्ही आहात म्हणून तुम्हाला नमन” असं अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) म्हणाल्या.

भाजपाने अनेक योजना आणल्या आहेत

लाडकी बहीण ही एकच योजना नाही. अनेक योजना भाजपाने आणल्या आहेत. सुकन्या समृद्धी, लेक लाडकी, माझी कन्या भाग्यश्री, अन्नपुर्णा योजना, विधवा पेन्शन योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सूट या योजनाही भाजपाने आणल्या आहेत. तुम्हाला या योजना माहीत नसतील तर माहीत करुन घ्या इतर महिलांनीही याची माहिती द्या. जी महिला पात्र ठरु शकते तिला फॉर्म भरण्यासाठी उत्साह द्या. असंही अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Amruta Fadnavis : “देवेंद्र फडणवीस अजिबात रोमँटिक नाहीत, लग्नापूर्वी…”, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

मोठा नेता माझं कुटुंब आणि माझीच जबाबादारी म्हणतो…

नागपूरचा कायापालट हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींमुळे झाला आहे, महाविद्यालयं आली आहेत. नागपूरचा विकास होतो आहे. नागपूरला मोस्ट लिव्हेबल सिटी म्हटलं जातं. अनेक कंपन्या कॉर्पोरेट ऑफिसेस बांधत आहेत. त्याचा फायदा आपल्या घरांपर्यंत चालत येणार आहे. या योजना चालू राहण्यासाठी आपण जसं मोदींना निवडून आणलं तसं महाराष्ट्रातही भाजपा भक्कम होणं आवश्यक आहे. काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय? तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण स्त्रिया हे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत. पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी तर तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी. मोठे नेते म्हणू शकत. देवेंद्र फडणवीस असं कधी म्हणाले नाहीत आणि म्हणणार नाहीत कारण त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. असं म्हणत अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसंच त्यांनी शरद पवारांवरही नाव न घेता टीका केली.

मुलीला मुख्यमंत्री करायची इच्छा असलेले नेते..

देवेंद्र फडणवीसांनी घराची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, ते महाराष्ट्रातल्या महिलांसाठी, वंचित घटकांसाठी २४ तास काम करतात. त्यामुळे अशी व्हिजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत. तुम्ही साथ द्याल याची मला खात्री आहे. तुम्हाला बाहेर पडायचं आणि लोकांनाही बाहेर काढायचं आहे की सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की तुम्ही मतदान करा. आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे. असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने मतदान करा असं आवाहनही अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केलं. नाव न घेता त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला.