सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपाच्या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? अनिल देशमुख म्हणाले, “मी एकटा…”

फडणवीसांकडून खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू

पुढे बोलताना, महाराष्ट्रात फडणवीसांकडून खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात? विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल झालेलं प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अटक करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यावेळी त्यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्हदेखील विधानसभेत सादर केला होता. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते, असं तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हटलं होतं. याचप्रकरणी आता सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.