Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी गौप्यस्फोट करणार असे संकेत दिले होते. त्यासाठी त्यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केलं होतं. ज्यात देवेंद्र फडणवीस, उंदीर आणि टरबूज दिसत होतं. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या त्यांच्या पुस्तकातले दोन उतारे त्यांनी पोस्ट केले आहेत.

अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप काय?

“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) जुलै महिन्यांत म्हणाले होते. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं होतं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते” असंही अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हटलं होतं. यानंतर आता अनिल देशमुख यांनी त्यांच्या पुस्तकातील उतारे पोस्ट केले आहेत.

हे पण वाचा- Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे

काय आहे अनिल देशमुख यांची पोस्ट?

महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील १६ आणि २० नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत. असं अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी म्हटलं आहे.

टरबूजा या नावाने उल्लेख असलेला उतारा काय?

तुरुंगात अनेकांना घरचं जेवण दिलं जात असे. मात्र मला घरचं जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगातलंच जेवण दिलं जायचं. तुरुंगातील जेवण कसं असतं याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे? याची धाकधूक सतत असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्या सेलमध्येही उंदीर आणि चिचुंद्र्यांची अगदी भाऊगर्दी व्हायची. कित्येकदा असं व्हायचं की जेवण यायचं आणि मला जेवायला उशीर झाला तर त्यावर उंदीर-चिचुंद्र्या तुटून पडलेले असायचे. यामुळे कित्येकदा उपाशी झोपण्याची वेळही माझ्यावर आली आहे. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी १२ वाजता सेलचे दरवाजे बंद व्हायचे ते थेट दुसऱ्या दिवशी बारा वाजता उघडायचे. रविवारी दुपारी आलेलं जेवण उरवून ते उंदीर चिंचुंद्र्यांपासून राखून ठेवावं लागायचं. त्यासाठी ते बादलीच्या वर ठेवावं लागायचं आणि त्याची राखण करावी लागायची ते वेगळंच. हा उतारा अनिल देशमुख यांच्या पुस्तकात पान क्रमांक १८० वर आहे. यापुढे त्यांनी टरबूजा हा उल्लेख केला आहे.

टरबूजा नावाचा गल्लेलठ्ठ उंदीर

तुरुंगात तसे तर खूपच उंदीर आणि चिचुंद्र्या होत्या. त्यामध्ये एक उंदीर वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच तुरुंगातले सगळे त्याला टरबूजा म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला तरीही तो अशा काही नजरेने बघायचा की जणू काही ती नजर सांगत असायची मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. असा उल्लेख अनिल देशमुख यांनी पुढच्या पानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना अनिल देशमुख यांनी गलेलठ्ठ उंदराशी केली आहे. तर त्यांच्या पुन्हा येईन या घोषणेची अनिल देशमुख यांनी खिल्ली उडवली आहे.