Anil Deshmukh On Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, तर अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली.

दरम्यान, या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांचा स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, असा सवाल अनिल देशमुख यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केला आहे.

हेही वाचा : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं?

“बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक, भाजपा पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

बदलापूर प्रकरण नेमकं काय?

बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. वैद्यकीय तपासणीनंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी बदलापुरात नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती. दरम्यान, अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु होता.