महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दि. १आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी रत्नागिरी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी राज्यभरातून १७ जिल्ह्यातून १२५ अंनिस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीत काय ठराव मंजूर झाले?

१) अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिस तर्फे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ स्थापन करून त्याव्दारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणे.
२) जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर व्हावा या साठी देशपातळीवर पाठपुरावा करणे.
३) सुशिक्षितांचा अंधश्रध्दा या विषयी प्रबोधन अभियान राबवणे
४) आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह ,सत्यशोधकी विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करून अंनिसच्या राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह वधू वर सूचक मंडळाचे काम सुरू करणे.
५) जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य या विषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे.
६) सोशल मीडिया मधून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि मोबाईलचे व्यसन या विषयी काम करण्यावर भर देणे

अंधश्रद्दा निर्मूलन महिला परिषदही होणार

मार्च महिन्यात विदर्भात नागपूर येथे राज्यव्यापी ‘अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद’ घेण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘संघटना बांधणी अभियान’ फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ पर्यंत राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मध्यवर्तीचे दोन प्रतिनिधी महाराष्ट्रातील अंनिसच्या सर्व शाखांना भेटी देतील. या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता रत्नागिरी येथील प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्यानंद भुते (क्रेडाई, रत्नागिरी) हे होते. यावेळी रत्नागिरी येथील आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

दोन सत्रांत काय काय झालं?

दुपारच्या सत्रात गेल्या सहा महिन्यात अंनिस तर्फे राज्यभरात राबवलेल्या विविध उपक्रम अहवालाचे वाचन राज्य कार्यकारी समिती सदस्य ॲड. मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलासकर यांनी केले. त्यानंतरच्या दोन सत्रात महाराष्ट्रातील राज्यभरातून आलेल्या जिल्हा कार्याध्यक्षांनी,सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा कार्य अहवाल राज्य कार्यकारणीसमोर सादर केला. समितीचा महिला विभाग, प्रकाशन विभाग, संघटना बांधणी आणि प्रशिक्षण विभाग, बुवाबाजी संघर्ष, मानसिक आरोग्य विभाग, विविध उपक्रम विभाग, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्या कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्याचे नियोजन घेण्यात आले.

या दोन दिवशीय बैठकीच्या सांगता समारोह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास विद्वांस, (मुख्य कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी, रत्नागिरी) यांनी येथील आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत होणारे हे कार्यक्रम नेहेमीच भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याशी निगडित मूल्यांना बढावा देणारे असतात असे सांगितले. पर्यावरण अभ्यासक डॉ. केतन चौधरी (रत्नागिरी शासकीय फिशरीज कॉलेज) यांनी सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. माय कोकण या वेब पोर्टलचे प्रवर्तक पत्रकार मुश्ताक खान यांचे देखील समोयोचित भाषण झाले.

दोन दिवसांच्या या राज्य कार्यकारणीचे संयोजन विनोद वायंगणकर, राहुल थोरात, राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, अतुल तांबट, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, सम्राट हटकर यांनी केले. दिपक गिरमे, गणेश चिंचोले डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते.