ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्वास सुरू असेपर्यंच हे काम असंच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता.
दरम्यान, आप्पासाहेबांनी पुरस्कारासह मिळालेली २५ लाख रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे केली जाते. या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आप्पासाहेब म्हणाले की, “पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे”
अमित शाहांची स्तुतीसुमने
या पुरस्कार सोहळ्याला आलेले प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कोणत्याही प्रसिद्धी आणि आपेक्षेशिवाय सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला इतका मोठा जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”