छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे. याआधी संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आमदारकीसह मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या पालकमंत्री पदावरून भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच आपल्याला पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळेल, असं म्हणत सूचक विधान केलं. “जसा क्रिकेटचा खेळ असतो तशी ही शेवटची ओव्हर आहे. तीन महिन्यांचं हे पालकमंत्रीपद असून मिळालेल्या संधीचं सोनं करेल”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

हेही वाचा : “बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी”; विजय वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

“छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून कुठेही वाद नव्हता. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जागा ही शिवसेना शिंदे गटाची जागा आहे. त्यामुळे शिवेसेनेत पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणावर द्यायची हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. पालकमंत्री पदासाठी आमचा भारतीय जनता पार्टीशी कोणताही वाद नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय एकमताने घेतला आहे. पालकमंत्री पदाबाबतची सर्व चर्चा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली आहे. सर्वांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री शिंदे यांनी मला पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

सत्तार पुढे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी सर्वांना विश्वासत घेऊन पालकमंत्री म्हणून मी काम करेन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी अखर्चित निधी असून जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी तात्काळ पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात यावी, असं अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांचे मी आभार मानतो. शेवटी वेळ कमी आहे. जसा क्रिकेटचा खेळ असतो तशी ही शेवटची ओव्हर आहे. तीन महिन्यांचं हे पालकमंत्रीपद आहे. पण त्यामध्ये आपण काय करु शकतो? हे कार्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रयत्न करणार आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.