सोलापूर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणण्याच्यादृष्टीने प्रशासनाने तयार केलेल्या सुमारे २५० कोटी रूपये खर्चाच्या सोलापूर एकात्मिक फर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात उजनी धरण जल पर्यटनासह, कृषी, धार्मिक आणि फलोत्पादनाशी संबंधित पर्यटन अशा चार प्रमुख घटकांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा आराखडा सादर केला. चालू आर्थिक वर्षात या आराखड्यासाठी २५० कोटींची तरतूद करण्यास शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे आदी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखडा प्राथमिक स्तरावर सादर झाला होता. दळणवळणाचे भक्कम जाळे असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ९४ पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे जलपर्यटनासह टुरिझम तसेच जल क्रीडा पर्यटन वॉटर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे ९० किलोमीटर लांबीचे पात्र असून पात्राची रुंदी सुमारे सहा किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवयला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

हेही वाचा : “…तर एकही खासदार निवडून आला नसता”; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हेलियन निर्माण करण्यात येऊन यात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, एक हजार पर्यटकांच्या क्षमतेचे सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल, सर्व वयोगटासाठी देशातील सर्वात मोठा तरणतलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आशीर्वाद यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनात ही अग्रेसर असून पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन केंद्रे विकसित केली जात आहेत.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “भाजपा आणि मिंध्यांना माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर…”

उजनी धरणावरील पर्यटन विकास आराखड्याच्या सर्वेक्षणास लगेचच सुरुवात होणार आहे. कृषी व फलोत्पादनाशी संबंधित पर्यटन विकास आराखडा ३०जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण १५ऑगस्ट रोजी होणार आहे व त्यानंतर राज्य शिखर समितीची मान्यता मिळून पुढील सहा महिन्याच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.