अहिल्यानगर : अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या श्रीरामपूर येथील कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार देत आर्थिक नुकसानीपासून वाचवले. शिवाय या कुटुंबातील महिलेच्या डोक्यावरील केसाची सुमारे अडीच किलो वजनाची बटही काढून टाकत, महिलेला मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्त केले.श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरपासून हाकेच्या अंतरावरील गावात एका कुटुंबातील महिलेच्या डोक्यात केसांचा गुंता झाला होता. सन २०१९ पासून केसाचा गुंता होण्यास सुरुवात झाली. हळूहळू तो वाढतच गेला व लांबलचक असलेले केस एकमेकाला घट्ट चिकटले. काहीही केल्या हा गुंता सुटेना. गुंता सुटण्याकरिता वेगवेगळे साबण, शाम्पूचा वापर करण्यात आला. परंतु केसाचा गुंता अधिकच जाड होत गेली. त्यामुळे कुटुंब पुरते हवालदिल झाले. काय करावे हे सुचेनासे झाले. त्यातच हा प्रकार म्हणजे एखाद्या दैवताचा कोप असावा असा समज काहींनी करून दिल्याने या कुटुंबाने भोंदू बाबाकडे धाव घेतली.

अगोदर भोंदू बाबाने या महिलेच्या गळ्यात मण्याची एक माळ घातली व त्या मोबदल्यात २५ हजार रुपये या कुटुंबाकडून घेतले. त्यानंतर महिलेच्या डोक्यावर झालेल्या केसाच्या गुंत्याच्या बटीचा पूर्ण बंदोबस्त करावयाचा असल्यास १ लाख रुपये खर्च येईल, असेही भोंदू बाबाने सांगितले. तिचा मुलगा व पतीचा यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या ॲड. रंजना गवांदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दूरध्वनीवरूनच त्या सर्व कुटुंबांचे समुपदेशन केले. त्यानंतर आम्ही समक्ष भेट घेण्याकरता येतो, असे त्या कुटुंबाला सांगितले. त्यानंतर ॲड. रंजना गवांदे, छाया विनायकराव बंगाळ, देविदास देसाई, अशोक गवांदे, अंनिसचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या घरी गेले. सर्व प्राथमिक माहिती घेतल्यानंतर हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा असून तुमच्या अज्ञानाचा बुवा, भोंदूबाबा गैरफायदा घेत असल्याचे त्या कुटुंबाला पटवून दिले. त्यानंतर ती महिला बट काढून देण्यास तयार झाली. ॲड. रंजना गवांदे यांनी स्वतःच्या हाताने अडीच किलो वजनाची ती बट कापली. त्यांना छाया बंगाळ, देविदास देसाई व अशोक गवांदे यांनी सहकार्य केले.

मानसिक, शारीरिक स्वास्थ्य परतले

महिलेच्या डोक्यावरील केसांचा गुंता होऊन तयार झालेली बट सुमारे २.५ किलो वजनाची होती. हा भार सहा वर्षांपासून झेलणाऱ्या या महिलेला मणक्याचे, खांद्याचे विकार सुरू झाले होते. रात्री झोपदेखील येत नव्हती. कायम डोके दुखत असायचे. परंतु ही अडीच किलोची बट काढल्यानंतर त्या महिलेला डोके एकदम हलके झाल्यासारखे वाटले. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अंनिसचे कार्यकर्तेही भारावून गेले. श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भोंदू बाबांची दुकानदारी सुरू असल्याचे काही नागरिकांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

भोंदूबाबापासून सावध रहा

अंनिसच्या रंजना गवांदे व देविदास देसाई यांनी सांगितले की, कुणीही भोंदूबाबाच्या आहारी जाऊ नका. कुठल्याच भोंदूबाबाला काहीही तंत्रमंत्र, कुठलीच विद्या येत नसते. अंगात येणे हे थोतांड आहे. कुठल्याही व्यक्तीच्या अंगात देव येत नसतो. हा मानसिक आजार आहे. केवळ आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे लोक समाजाची फसवणूक करतात. अशा भोंदूबाबापासून सावध राहावे व भोंदूबाबापासून कुणाची फसवणूक झाल्यास ‘अनिसं’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गवांदे व देसाई यांनी केले आहे.