अंधेरी-पूर्व मतदारसंघाची ३ नोव्हेंबरला होणाकी पोटनिवडणूक रंगतदार वळणावर चालली आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात हा ‘सामना’ रंगणार आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शक्तीप्रदर्शनात भाजपाचे अनेक नेते सामील झाले होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला हवे. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावाने रडत होते. आता विरोधी पक्षात असताना न्यायालय, निवडणूक आयोगाच्या नावाने रडत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरेंबरोबर ‘रडकी शिवसेना’ आहे,” असा टोला आशिष शेलारांनी लगावला आहे.
हेही वाचा – “नारायण राणे आणि पनवती हे समीकरण…”, विनायक राऊतांची कडवट टीका
“…तर उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असता”
अंधेरी निवडणुकीबाबात दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सहानभुती असती तर, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मन मोठं आहे. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांना शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा दिला होता. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यासाठी पुढे यावे लागते, सर्वांना एकत्र येण्याची विनंती करावी लागते,” असेही दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.