कराड : सातारा जिल्हा हा शरद पवारांचा. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हेतर भाजपचा बालेकिल्ला झाला असल्याचा टोला लगावताना, जिल्ह्यात महायुतीचे भाजप चार, शिवसेना (शिंदे), राष्ट्रावादी (अजित पवार) पक्षाला प्रत्येकी दोन जागांचे सूत्र ठरल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.

कदम म्हणाले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण नुकतीच भेट घेतली. त्यातून सातारा जिल्ह्यात भाजपला चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन आणि अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला दोन-दोन जागा असे विधानसभेसाठी जागावाटप राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचे कदम म्हणाले.

हेही वाचा >>>Daily Fuel Rates : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! चेक करा तुमच्या शहरांतील आजचा भाव काय असणार?

‘महायुती’ जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत जिंकेल अशीच सद्य:स्थिती आहे. भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माण- खटावमधून जयकुमार गोरे या विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. कराड दक्षिणेतून डॉ. अतुल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. परंतु, ‘कराड- उत्तर’चा निर्णय अधांतरीच आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून फलटण आणि कराड उत्तर मतदारसंघांसंदर्भात कुठला मतदारसंघ पक्षाकडे ठेवायचा आणि कुठला सोडायचा किंवा काय याबाबत विचार सुरू आहे. फलटणमधील रामराजे समर्थक आमदार दीपक चव्हाण हे शरद पवार यांच्यासोबत गेल्याने अजित पवारांनी फलटण मतदारसंघ भाजपला सोडून ‘कराड उत्तर’साठी आग्रह धरला आहे. मात्र, भाजपची ‘कराड उत्तर’मध्ये मोठी ताकद असल्याने या मतदारसंघासाठी आम्ही फडणवीस, बावनकुळे यांना साकडे घातल्याचे कदम यांनी सांगितले.

‘कराड उत्तर’मधून भाजपचे मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमरावकाका पाटील आणि आपण स्वतः असे चौघेजण इच्छुक आहोत. परंतु, भाजप किंवा महायुतीकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण भाजप ताकदीने प्रयत्न करेल असे धैर्यशील कदम यांनी सांगितले. कराड उत्तरमधून भाजपतर्फे मी स्वतः इच्छुक असलो तरी भाजपने उमेदवारी दिली तरच लढणार आहे. अन्यथा, ‘महायुती’तून ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी कदम यांनी आपली व जिल्हा भाजपची भूमिका स्पष्ट केली.