जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. परंतु, पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होऊन नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशानिमित्त परतूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी ते जालना जिल्ह्यात रविवारी आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चव्हाण म्हणाले, या वेळेस भाजप आणि महायुतीमधील पक्षांना पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचा समन्वय सुरू आहे. काही गैरसमज दूर झाले असून काही दूर होतील. काही प्रश्न शिल्लक आहेत.

हेही वाचा >>> कारण राजकारण : सुरेश खाडेंपुढे विरोधक असंघटित पण पक्षांतर्गत आव्हान

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, कुणाचे आरक्षण काढून घेणे सोपे नाही. या विषयावर कुठेही वाद होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तशी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. जे उर्वरीत प्रश्न बाकी आहेत, त्याबाबत नक्की पाठपुरावा करण्यात येत आहे. चर्चेतून आणि समन्वयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न आहेत.

पवारांच्या डोक्यातले आम्हाला काय करायचे ?

शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना शंभर जन्म घेतले तरी कळणार नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे याच्याशी आम्हाला काय करायचे ? आम्हाला आमच्या डोक्याने काम करायचे आहे.