औरंगजेबाच्या कबरीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फुलं वाहिली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाची कबर नुसती उखडू नका ती कबर समुद्राच्या मध्यभागात फेका असं त्यांनी म्हटलं आहे.
“अजमल कसाब किंवा औरंगजेब यांच्यासारखे लोक हे कधीही प्रेरणास्थान असू शकत नाहीत. वैचारिक प्रेरणास्थानं या देशात आहेत. त्यामुळे असे लोक प्रेरणास्थान असूच शकत नाही. औरंगजेबाची कबर फक्त उखडून टाकता कामा नये ती समुद्रात मध्यभागी नेऊन बुडवली पाहिजे. जगात पुढारलेला देश अमेरिका आहे. त्यांनी ओसामा बिन लादेनचं प्रेत कुठे नेऊन टाकलं? तर समुद्राच्या मध्यभागी. अगदी त्याचप्रमाणे औरंगजेबाची कबरही उखडून ती समुद्राच्या मध्यभागी फेकली पाहिजे. “
बाळासाहेब आंबेडकर हे कधीही जातीय राजकारण करत नव्हते. त्यांना याची जाणीव असली पाहिजे की अकोल्यात जेव्हा ते लढले तेव्हा काँग्रेस कसा उमेदवार देत होते? बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी काँग्रेसने कायमच अल्पसंख्याक समुहाचा वापर केला. सोलापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणीही आपण पाहिलं की उमेदवारांना कसा त्रास दिला गेला? बाळासाहेब आंबेडकरांना हे माहित आहे असंही गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
नथुराम गोडसेवरही भाष्य
नथुराम गोडसेंनी कधीही देशाचे तुकडे करा म्हटलं नाही. त्यांचा विचार अखंड भारताचा विचार होता. अफगाणिस्तान ते श्रीलंकेपर्यंत अखंड भारत आहे. त्यांचं म्हणणं काय चुकीचं होतं? महात्मा गांधींचे दोन विचार कधीही मान्य करणार नाही. मात्र त्यावेळी घाणेरडं राजकारण त्यावेळी काँग्रेसने केलं. या देशातला बौद्धांचा विचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार साता समुद्रापार पोहचला आहे. अमेरिकेतही आरएसएसची चर्चा होते.