Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची तिघांनी गोळ्या झाडून मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी फरार आहे. त्या आरोपीचा शोध घेणं सुरु आहे. या प्रकरणाने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांना उत्तरही दिलं आहे.

दोन आरोपींना कोर्टात करण्यात आलं हजर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग, धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.

वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) हल्ला करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र आणि वाहन कुणी पुरवलं? याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले. बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) हत्येमागे नेमकं काय कारण आहे? आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं. “त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता, याचाही तपास करावा लागेल”, असं सरकारी वकिलांनी म्हटलंय.

हे पण वाचा- Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?

बचाव पक्षाचे वकील काय म्हणाले?

बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आणि असा दावा केला की अटक केलेल्या दोघांनी गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. “मृत व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यांचे अनेक शत्रू असू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असण्याची शक्यता आहे”, असा युक्तिवाद सिद्धार्थ अग्रवाल यांनी केला.