Baba Siddique मुंबईत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे महाराष्ट्र हादरला आहे. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो आहे. बाबा सिद्दीकी हे रात्री ९ च्या सुमारास त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा हल्लेखोर फरार आहे. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर पोस्ट लिहिली आहे.

बाबा सिद्दीकींवर तीन अज्ञातांनी केला गोळीबार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडली होती. बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकी प्रसिद्ध होते. आज रात्री साडेआठच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) तीन अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारात बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) जखमी झाले. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हे पण वाचा- Baba Siddique Shot Dead : राजकारणातला अजातशत्रू! गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी कोण होते?

वांद्रे सिग्नलवर नेमकं काय घडलं?

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. हे तीन लोक कोण होते? ते अद्याप समजू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकींवर कुणी गोळीबार केला? त्यामागचं कारण काय होतं? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया काय?

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे असंही राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

डॉ. जलील पारकर काय म्हणाले?

“साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत.” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.