सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे, असं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा असताना आता त्यांच्या या विधानावरून पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा – “…म्हणून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पुढे ढकलला जातोय”, शिवसेनेचा सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल!
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी, अशी आमची इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; महिलेसह चौघांचा मृत्यू
दरम्यान, मंत्रीमडंळ विस्ताराबाबत टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना, “धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळविस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे”, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, काल परभणीत झालेल्या पत्रकार परिषदे बोलताना, प्रहार संघटनेने दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली असून येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.