गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बच्चू कडू यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केल्यामुळे बच्चू कडूंनी समाधान व्यक्त केलं होतं. तसेच, या मंत्रालयाचा कारभार बच्चू कडूंनाच मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र, अजित पवार गटाच्या समावेशामुळे मंत्रीपदांसाठी तिसरा गट वाटेकरी म्हणून आला आणि ही आशाही संपल्यात जमा झाल्याचं बोललं जाऊ लागलं. या पार्श्वभूमीवर आज बच्चू कडूंनी मंत्रीपदावरील दावा सोडत असल्याचं जाहीर केलं.

देशात आज दोन महत्त्वपूर्ण बैठकांची चर्चा आहे. एकीकडे बंगळुरूमध्ये भाजपविरोधी पक्षांची बैठक होत असताना दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक आहे. या बैठकीसाठी आमदार बच्चू कडूही दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपला निर्णय जाहीर केला. वास्तविक पाच दिवसांपूर्वी, अर्थात १३ जुलै रोजी बच्चू कडूंनी यासंदर्भात संकेत दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार, असं ते म्हणाले होते. त्यानुसार आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं. “४०-५० आमदार आहेत. मंत्रीपदं कमी आहेत. आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी प्रचंड चढाओढ चालू आहे. या सगळ्यात माझी भूमिका एका मित्राची आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं ही मोठी बाब आहे. त्यांची अडचण दूर झाली पाहिजे म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी आग्रह केला. ते म्हणत होते की तुम्ही आम्हाला मंत्रीपदी हवे आहात. मी त्यांना सांगितलं की एकंदरीत अडचण आहे. माझ्यापेक्षा दुसरं जर कुणी त्या ठिकाणी खूश होत असेल, तर हरकत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

Video: बच्चू कडू यांची मोठी घोषणा; म्हणाले, “मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा माझा निर्णय…!”

१३ जुलै रोजीच स्पष्ट केली होती भूमिका

दरम्यान, बच्चू कडूंनी १३ जुलै रोजी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ““मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असं ते म्हणाले आहेत. त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन”, असं बच्चू कडू तेव्हा म्हणाले होते.

“एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे”, असंही ते म्हणाले होते.

Story img Loader