अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटातून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही त्यांचा खातेवाटप झालेला नाही. याशिवाय आधीच मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले शिंदे गट आणि भाजपातील आमदारही नाराज असल्याची चर्चा होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे बहुतांश आमदार मुंबईत आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व आमदार मुंबईले गेले असताना अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूरमध्ये आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू म्हणाले, “माझी कार्यकर्त्यांबरोबर बैठक आहे. उद्या पारधी मेळावाही आहे. मुंबईत राहिलं तर मंत्रीपद मिळतं आणि गावी राहिलं तर मिळत नाही, असं नाही. शेवटी मंत्री असो अथवा नसो, काम तर करावंच लागतं. कामासाठीच मी परत आलो. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल. सरकारमध्ये तीन इंजिन आहेत. त्यामुळे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडही होऊ शकतो.”

“तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका”

“तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका सुरू असतील. या सगळ्या अचानक झालेल्या घटना आहेत. यात नकळतपणे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे त्यात थोडा चिंतेचा विषय आहेच. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणत्या जिल्ह्याला कुणाला पालकमंत्री करायचं या अनेक भानगडी आहेत. दिसताना सोपं वाटतं, पण आतून आम्ही पाहतो तेव्हा सर्व पोखरलेलं असतं,” असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं.

“तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे?”

“तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे?” या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “मला कोणतीही अपेक्षा नाही. जशी परिस्थिती येईल त्यात आम्ही मार्गक्रमण करत असतो. मी अपेक्षा ठेऊन कधी चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्रीपदाबाबत गेल्या दोन-तीन दिवसात मला कोणताही फोन आलेला नाही.”

हेही वाचा : अजित पवारांच्या शपथविधीमुळे शिंदे गट, बच्चू कडू नाराज? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “आम्हा सगळ्यांना…”

“हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक”

“सत्ताधारी पक्षाचे ९० टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे. इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. सगळे आनंदी आहेत असं नाही. विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत. त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu comment on cabinet expansion of shinde fadnavis pawar government pbs
Show comments