Badnera Vidhan Sabha Assembly 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी आपल्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. यात शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघामधून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे ठाकरे गटाच्या प्रीती बंड या नाराज झाल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून बडनेरा मतदारसंघामधून प्रीती बंड (Priti Band) यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ऐनवेळी सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे प्रीती बंड नाराज झाल्या. यानंतर आता प्रीती बंड यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भात प्रीती बंड यांनी आपण २८ तारखेला अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा : Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”

प्रीती बंड काय म्हणाल्या?

“आपल्याला मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्याला अपमानाचा बदला घ्यायचा आहे. काही गोष्टी सुटतील काही गोष्टी मागे राहतील. तुम्ही सर्वजण एकदिलाने बरोबर आहात आणि अशापद्धतीने बरोबर राहिलात तर आपल्याला २३ तारखेला दाखवायचं आहे की आपण सोबत लढलो आणि यापुढेही सोबतच आहोत. या ठिकाणी जे कार्यकर्ते बसले आहेत. त्यांच्यासह सर्व ताकद आपल्याला एकत्र आणायची आहे. कारण त्याशिवाय जिंकण कठीण आहे. मला तकीट मिळाले नाही म्हणून मी निवडणूक लढत नाही. माझी लढाई येथील आमदाराबरोबर आहे आणि आपल्या अपमानाबरोबर आहे. हे बोलण महत्वाचं आहे. अन्यथा त्यांना हे समजणार नाही की ही लढाई कशासाठी आहे. त्यामुळे मी आता निवडणूक लढणार असून आता २८ तारखेला अपक्ष अर्ज दाखल करत आहे”, असं प्रीती बंड यांनी म्हटलं आहे.

उमेदवारी नाकारल्‍याने प्रीती बंड नाराज?

बडनेरा मतदारसंघातून (Badnera Vidhan Sabha Assembly) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्‍हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. त्यामुळे प्रीती बंड यांच्यासह त्‍यांच्‍या समर्थकांना धक्‍का बसला. कारण प्रीती बंड यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीती बंड यांनी म्हटलं की, “मला अगोदर कामाला लागा असे सांगण्‍यात आले. त्यामुळे मी गेल्‍या अनेक दिवसांपासून पदयात्रा आणि मतदारांच्या भेटी सुरू केल्या होत्या. मात्र, आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतलाय, त्यानंतर कोणाशी काय बोलावे हे सुचतच नाहीये. गेल्‍या चार दशकांपासून बंड कुटुंबीय शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकनिष्ठ आहे. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे सर्व शिवसैनिकांनी पैसे गोळा करू आणि निवडणूक लढवू असे ठरवले. त्या दृष्‍टीने सगळे कामाला देखील लागले होते. मात्र, अचानक काय झाले, हे कळलं नाही”, असं म्हणज प्रीती बंड यांनी नाराजी व्यक्त केली.