अहिल्यानगरःपरकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला. जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी अस्तित्व ठेवू नये. अन्यथा प्रत्यक्ष ‘कारसेवा’ कृती करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. ही कारसेवा आयोध्येतील दि. ६ डिसेंबर १९९२ प्रमाणे असेल असेही बजरंग दलाने स्पष्ट केले
बजरंग दलाच्या महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी हा इशारा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री शरद नगरकर यावेळी उपस्थित होते. यासाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात, सोमवारी (दि. १७),.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विश्व हिंदू परिषद देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आलमगीर या नावाने जिथे-जिथे उदातीकरण सुरू आहे ती सर्व ठिकाणे राज्य सरकारने नष्ट करावीत, कोणत्याही परकीयाचे नामोनिशाण या स्वतंत्र भारतात असू नये. औरंगजेबाचे अहिल्यानगर शहरात निधन झाले. पुढे त्याचे अवयव छत्रपती संभाजीनगर शहरात पुरण्यात आले. तिथेच खबर करण्यात आली. आज त्याचे उदत्तीकरण सुरू आहे. स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाची कबर अस्तित्वात असणे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी असल्याचा दावाही विवेक कुलकर्णी यांनी केला.
हिंदूंच्या कराच्या निधीतून पुरातत्व विभाग औरंगजेबाची कबर जतन करतो आहे. या पुरातत्त्व विभागाचीही फेररचना करावी, अशी मागणी त्यांनी केली. हिंदुद्वेषी असलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून वध केला. त्याचे कोणतेही स्मारक कबर भारतात असणे हे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजी ‘महाराजांच्या सन्मानासाठी बजरंग दल मैदानात’ अशा स्वरूपाचे आंदोलन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानासाठी हिंदू जागृत होत आहेत. हिंदू हिताच्या मागण्या त्यातूनच पुढे येत आहेत, त्यामुळे समाजवादी व साम्यवादी उफाळून येत आहेत, अशी टीकाही विवेक कुलकर्णी यांनी केली.