विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. थोरात यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह बाहेर आल्याचे म्हटले जात होते. असे असतानाच आता बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नाराजीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या नाराजीवर भाष्य केले.
हेही वाचा >>> कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच संभाजीराजेंचा नव्या राज्यपालांना मोलाचा सल्ला, म्हणाले “ज्या चुका…”
मी या अधिवेशनाला जाणार आहे
“मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
हेही वाचा >>> “…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले…
हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच
“प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत,” असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “आता पैसे देणाऱ्यांचे सरकार आले आहे”, देवेंद्र फडणवीसांचा आघाडीला टोला; म्हणाले, “फुटकी कवडी न देणाऱ्यांना..”
दरम्यान, तुमची नाराजी दूर झाली का? या प्रश्नाचे बाळासाहेब थोरात यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.