अलीकडील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच अजित पवारांनी ८ एप्रिलला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त एका वर्तमानपत्राने दिलं आहे. यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून, अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबद्दल आता काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार आणि काँग्रेसचे आमदार फुटू शकतात अशी चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “ही चर्चा मी सुद्धा ऐकत आहे. पण, वस्तुस्थितीत तसं काही वाटत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. तेव्हा सोडून जाण्याचा कोण कशाला विचार करेल.”
हेही वाचा : अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमच्या…”
“नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याला कारण अन्यायाने महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यात आलं. शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम राहणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मोठा विजय होईल,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “अजित पवार काही आमदार घेऊन बाहेर पडत असतील तर…”, गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलं मत
“काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल ‘मातोश्री’वर आज ( १७ एप्रिल ) उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची देशभरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच विषयी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.