मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज (२१ जुलै) या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला. तसेच त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षातील इतर आमदारांनीही सभात्याग केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरमधील घटनेवर बोलू न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आमदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, मणिपूरमध्ये घडलेली घटना ही केवळ मणिपूरची आहे असं म्हणता येणार नाही. अडीच महिने याप्रकरणी गुन्हादेखील नोंदवण्यात आला नव्हता. कोणतीही कारवाई केली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हालचाल सुरू झाली. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे. काही लोक ही घटना लोकांपासून लपवून ठेवू पाहत होते.

हे ही वाचा >> “मगरीचे अश्रू आता…”, मणिपूर घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर संजय राऊतांचा संताप

बाळासाहेब थोरात म्हणाले, काल (२० जुलै) या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. परंतु ते संसदेबाहेर येऊन बोलले. ते संसदेत याविषयी काहीच बोलले नाहीत. मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ही घटना खूप गंभीर आहे. या घटनेमुळे जगभर आपल्या देशाची छी-तू होत आहे. आज या विषयावर आमच्या महिला आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही. पाच मिनिटंसुद्धा त्यांनी दिली नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाच्या मनात या घटनेप्रकरणी आपण गुन्हेगार असल्याची भावना आहे. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. म्हणून महिला आमदारांना विधानसभेत त्यांनी बोलू दिलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat says bjp feels they are criminals in manipur violence asc
Show comments