राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सराकरमधील मंत्री उपस्थित होते. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात पार पडला. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
‘महाराष्ट्र भूषण’च्या या पुरस्कार सोहळ्याला आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी ४२ अंश सेल्सियसच्या तापमानात उपस्थित होते. रणरणत्या उन्ह्यामुळे अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : अजित पवार आणि काँग्रेसचे आमदार फुटणार? बाळासाहेब थोरात स्पष्टीकरण देत म्हणाले…
“हा प्रसंग दुर्दैवी आहे. कार्यक्रमाचं नियोजन करताना वेळ, सध्याच्या तामपानाचा विचार करण्यात आला नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्रद्धेपोटी लोक आले. थोडीच सरकारसाठी येणार होते. सरकार म्हणून बारकावे आणि नियोजन करू शकत नसतील, तर हे फार मोठं अपयश आहे. याबाबत ज्यांनी निर्णय घेतले ते या घटनेला जबाबदार आहेत.”
हेही वाचा : “अजित पवार काही आमदार घेऊन बाहेर पडत असतील तर…”, गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलं मत
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेतच कार्यक्रम घेतला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी कार्यक्रम करणारे सरकार असते. आप्पासाहेबांनी वेळ दिला असला, तरी ही वेळ योग्य नसल्याचं सरकारच्या वतीने सांगायला हवं होतं.”