देशभरात पेपर फुटीचं प्रकरण गाजतंय. नीट आणि नेट पेपरफुटीवरून संसदेतही गोंधळ सुरू झाला आहे. तर, राज्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अधिकारी गट ब आणि अराजपत्रित पदाच्या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यता येतोय. त्यामुळे या विषयावर आज प्रामुख्याने विधानसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, फेक नरेटिव्ह (खोट्या बातम्या पेरणाऱ्यांविरोधात) सेट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

फेक नरेटिव्हबाबात सुरुवातीला आशीष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही कायदा बनवण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला. सर्व कायदे असतानाही गुन्हे घडत असतात, त्या कायद्यात सुधार करायचा असतो, व्यवस्था बदलण्याकरता कायद्यात सुधार करायचा असतो. राज्यातील युवकांच्या मनात गैर विश्वास निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं, यासाठी संघटितरित्या काम केलं जातं, अशी शंका आहे. त्यामुळे, असा गैरविश्वास निर्माण करणाऱ्यांची चौकशी करणार का? आणि राज्यात नवीन कायदा किती महिन्यांत आणणार? असा प्रश्न आशीष शेलारांनी उपस्थित केला.

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिमन्यू पवारांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की या अधिवेशनात हा कायदा आणू. पुण्यातील संस्थेचंही शिष्टमंडळ भेटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही निर्देश दिले आहेत, त्यानुसार हा कायदा आपण आणणार आहोत.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

सरकारच्या काळात अनेक पेपरफुटीची प्रकरणे घडली- भास्कर जाधव

आशीष शेलारांच्या प्रश्नावर उत्तर आल्यानंतर भास्कर जाधव यांनी राजस्थानातील परीक्षेतील गैरव्यवहार समोर आणला. ते म्हणाले, राजस्थानमध्ये शैक्षणिक परीक्षेतही गैरव्यवहार होतात. दहावी-बारावीसाठी काही खासगी संस्था उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांंना देतात. या उत्तरपत्रिकांच्या माध्यमातून नापास होणारे विद्यार्थी पास होता. हीच साखळी सरकारी नोकऱ्यांमध्येही सुरू राहते. त्यामुळे असा प्रकार महाराष्ट्रात घडत नाहीय ना, याची चौकशी करावी आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून सरकारे काय काळजी घेतली आहे, याची माहिती द्यावी, असं भास्कर जाधव म्हणाले. पुढे त्यांनी राज्यातील परीक्षेतील गैरव्यवहारांवरही चर्चा केली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही नरेटिव्ह सेट करतो. महापरिक्षा पोर्टल २०१८ ला फेल्युअर ठरलं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर २०२२, तलाठी परीक्षा २०२३, महानिर्मिती परीक्षा २०२३, वनविभाग परीक्षा २०२३, मृद आणि जलसंधारण परीक्षा २०२३ ला झाली. या प्रत्येकवेळी पेपर फुटले. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सर्व घडत होतं. पण आता फुटले तेव्हा या कालावधीत सराकर कोणाचं होतं? सरकार कोणाचंही असूद्या. पण हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जे कराल त्यासाठी आम्ही सहाय्य करू.

फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार

भास्कर जाधवांच्या या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी लागलीच उत्तर दिलं. “भास्करराव मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तेच तुम्ही मांडलं. तुम्ही जे वाचलं तो व्हॉट्सअप मेसेज आहे. पुण्यात एक वेबसाईट सुरू झाली आहे. त्या वेबसाईटचं कामंच ते आहे. या वेबसाईटवर हे पहिल्यांदा टाकलं. हे कोणतेही घोटाळे झालेले नाहीत. तुम्हीही शाहनिशा न करता व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवला. तुम्ही कोणतंही व्हेरिफिकेशन केलं नाही. मी आता त्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही, ज्याने हा फेक नरेटिव्ह सेट केला आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.