सांगली : शेतात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास कामगारासोबतच संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याात येईल, असा इशारा तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीने दिला आहे.

द्राक्ष बागांची फळछाटणी, तसेच अन्य कामे आता सुरू होत आहेत. या कालावधीत कामासाठी नाशिकसह बिहारमधून मोठ्या प्रमाणात मजूर या भागात दर वर्षी येतात. मात्र, या कामगारांकडून स्थानिक पातळीवर पक्षी, ससे, घोरपडे, मोर आदी वन्य प्राण्याची मांसासाठी शिकार केली जात असल्याचे आढळून येते. यामुळे गावशिवारात पक्षी व वन्य प्राणी नामशेष होण्याच्या स्थितीत आले आहेत. वन्य प्राण्यांच्या चोरट्या शिकारीला आळा घालण्यासाठी आता ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आहे.

हे ही वाचा…जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका

गावच्या सरपंचांच्या स्वाक्षरीसह याबाबत ग्रामस्थांना उद्देशून निवेदन जाहीर केले आहे. द्राक्षबागेत कामासाठी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांकडून वन्य प्राण्याची शिकार केली जाऊ नये अशा सक्त सूचना संबंधित कामगार व मुकादमांना देण्यात याव्यात. कामगाराने वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास संबंधित कामगाराबरोबरच ज्या शेतकऱ्याच्या बागेत संबंधित कामगार काम करत असेल, त्या द्राक्षउत्पादकालाही जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने ऊस हंगामात साखर कारखान्यांनीही ऊसतोड मजुराबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन मानद वनजीवरक्षक अजित पाटील यांनी केले आहे.